आणि फॅन चि लियांगला तर कष्टांची सवय नाही. हातात पुस्तक खेळवणारा, तो दगडधोंडे उरापोटी उचलीत होता. तो कसा वाचणार? त्याची वेठीची मुदत संपण्याआंतच तो मरणार! आणि खरेच काम करताना एक दिवस तो पडला, मेला! कामगार हळहळले. तेथे त्या विटांतच त्यांनी त्याचीहि समाधि बांधली! त्या भिंतीतच!
आज संक्रांत होती. सुटीचा दिवस आणि ती आली. कोणाला विचारणार पत्ता? ते पहा फाटक्या कपडयांतले बिगारी. ती लाज-या धीटपणाने पुढे होऊन म्हणाली,
''एक क्षणभर थांबा मित्रांनो.''
ती थकलेली होती तरी सुंदर दिसत होती. थोरामोठयांच्या घरातील वाटली. ते थांबले.
''येथे टेकडया आणि समुद्र मिळत आहेत. येथल्या कामांत माझा पति होता. फॅन चि लियांग त्याचें नाव. कोठे आहे तो?''
तो बांधकाम करणारे गवंडी होते. ते सद्गदित झाले व म्हणाले, ''त्याच्यासाठीच आज आलो आहोत. तो कोवळा तरुण होता, सुकुमार होता. श्रमाची सवय नाही. तो मेला. त्याचे प्रेत उघडे कसे टाकायचे? आम्ही त्याला पुरले. आज सणाचा दिवस. त्याच्या समाधीला फुले वाहायला, मैत्री दाखवायला आलो आहोत.''
ते बोलत होते, तिचे डोळे निराशेने जवळ जवळ मिटत आले. प्रियजनांचा चिरवियोग यासारखे दु:ख नाही. पतिपत्नींना जोडणारे नाते प्राणमय असते. पति मेला ऐकताच तिचा तडफडणारा, विव्हळणारा आत्मा शरीर फाडून जायला लागला.
शेवटची वेदनामय वाणी मुखातून बाहेर पडत आहे, ''नाथ, नाथ!''
ती पडली!
थोडया वेळाने पुन्हा सचेत होऊन म्हणाली, ''माझा पति किती सद्वर्तनी. तो प्रवचने करी, धर्मग्रंथ सांगे. तो परत येईल म्हणून कितीजण वाट पहात आहेत तिकडे. परंतु पाण्यांत दगड बुडावा तसा तो गेला. नाही, पुन्हा दिसणार नाही! शेवटचा निरोप घेताना तो जे बोलला त्याने पाषाणहि पाझरेल. म्हणाला, 'पतिपत्नींचे अभेद्य नाते असते. दोन पक्ष्यांचा जोडा. परंतु दुर्दैव ओढवले म्हणजे त्यांनाहि विमुक्त व्हावे लागते. पतीने पुरुषार्थ मिळवावा, कधी पत्नीला सोडू नये असे मला नाही का वाटत? परंतु येथे काय इलाज? पूर्वजन्मींच्या पापांची ही शिक्षा! दैवाला कोण जिंकणार? त्या लांब भिंतीपासून पुन्हा यायचा रस्ता नाही. आपण स्वप्नातच भेटू.' नाथ, तुमची वाणी खरी ठरली अखेर. मलाहि परत जायला रस्ता नाही! मला आता घर ना दार... मी मेल्यावर माझ्या देहाचे काय होईल चिंता नको. वारा माझ्या या भग्न हाडांची धूळ जगभर फेकील.'' ते बांधकाम्ये गहिंवरले व म्हणाले, ''नका रडू, पुसा डोळे, विसावा घ्या.''
त्याची बायको तिला विचारी, ''बाई कोठून आल्यात, कोठे जायचे?''
तिचे अश्रू धावत येत. हुंदका आवरून म्हणे, ''भिंत, उत्तरेकडची प्रचंड भिंत! वेठीला धरून माझ्या पतीला त्यांनी ओढीत नेले. त्याला भेटायला जाते. हे गरम कपडे घेऊन थंडीवा-यांतून जात आहे. घरी रडत बसण्यापेक्षा हा दु:खदायक प्रवास बरा. त्याला शोधीत जात आहे. त्याला पाहीन नि शान्त होईन.''
''वेडी तर नाहीस तू मुली? शेकडो हजारो मैल कशी चालत जाशील? थंडीचा कडाका. वाटेत वाटमारे, डाकू, तू सुंदर आहेस. तेच तर भय. नको जाऊ. हे तुझे सुकुमार पाय.''
''सर्व नात्यांत पतिपत्नींचें नातें श्रेष्ठ. सर्व संकटांची मला जाणीव आहे. परंतु माझे वेडे हृदय. त्याला पाहिल्याशिवाय विसावणार नाही. परत नाही फिरायचे या निश्चयाने मी निघाले आहे. मग आमची भेट धरित्रीच्या पोटात व्हायची असेल तरी तेथे होवो.''
ती म्हातारी खानावळी बाई म्हणते, ''मुली; तूं एकटी मी येऊ का सोबतीला? एकीपेक्षां दोघी ब-या. हा थकलेला देह येऊ दे का तुझ्या संगे?''
''नको आजीबाई नको. तुम्ही प्रेम दिलेत, दया दाखवलीत. तुमच्या मरणाला का मी कारणीभूत होऊं? शिवशिव. नाही आजी, ते बरे नाही. तुम्ही मला आईचे प्रेम दिलेत. पति भेटल्यावर परतेन तेव्हा तुमचे ऋण फेडीन हो.''
आजीबाई आणि मेंग चियांग कितीतरी वेळ बोलत बसतात. मग डोळा लागतो. उजाडले आता. रात्रीचे पहा-याचे हांकारे थांबले. कोंबडा आरवला. ती उठली. कपडयांचे बासन घेऊन निघाली.
थंडी, थंडी, कडक थंडी. कशी ही जाणार, कशी चालणार? वारा, चावरा वारा. झोंबतो अंगाला. कशी ही जाणार? पायांची चाळण झाली. अंगावरच्या वस्त्राच्या चिंध्या झाल्या. कशी राहणार थंडी? धुके, बर्फ, सारे गार गार, तिची हाडे दुखत आहेत. रक्ताळ अश्रू गळत आहेत. सुस्कारे! ते पहा उंच पर्व दिसू लागले. भिंत जवळ आली का? उत्तरेची भिंत? ती पर्व चढू लागली. भिंत कोठे आहे ती विचारी. आणि एक शेतकरी म्हणाला, ''आता जवळच आहे. समुद्रापर्यंत भिंत आता भिडेल. अघोरी काम.''
तिचे हृदय आशेने फुलले. जवळ आली भिंत. समोरचाच रस्ता. त्याला बघेन नि सारे श्रम नाहींसे होतील. अश्रूंची फुले होतील.
भिंतीचे काम लौकर आटपा. अपार खर्च होत आहे. करांखाली प्रजा आहे. लौकर आटपा काम. डोंगरावर पाणी न्यायचे, दगड चढवायचे! पाठीवर कडाड् चाबूक वाजे. हजारो मरत. सभोती हाडांचे ढीग!