३३ दोन महात्म्यांची भेट
गोलमेज परिषद आटोपल्यानंतर महात्मा गांधींना युरोपमध्यें थांबण्याची इच्छा नव्हती. तडक त्याच पावलीं परत हिंदुस्थानांत यावें असें त्यांचें ठरलें होतें. जर्मनी, फ्रान्स इत्यादि देशांतील अनेक मोठ्या आणि प्रसिध्द लोकांनी अत्यंत आग्रहाचीं आणि प्रेमाचीं बोलावणीं केलीं होतीं. त्या सर्वांचा महात्मा गांधींनी मोठ्या कष्टानें अव्हेर केला. रोमन रोलंड यांच्या निमंत्रणाला मात्र त्यांना नाहीं म्हणतां येईना. त्यांना भेटण्याकरिता महात्मा गांधीं मुद्दाम स्वित्झर्लंडमध्यें गेले.
रोमन रोलंड हे फार मोठे गृहस्थ आहेत आणि महात्माजींनी हिंदुस्थानांत जें कार्य चालविलें आहे, त्याचाच प्रकार रोमन रोलंड हे युरोप-अमेरिकेमध्यें करतात. अशा माणसाच्या शब्दाला नकार देणें महात्मा गांधींना जड गेलें हें उघडच आहे. कदाचित् रोमन रोलंड आणि आपली गांठ पडल्यानें जगांतील कलह थोडे तरी कमी होण्याचा संभव आहे, अशी महात्माजींना आशाहि वाटली असेल! स्वित्झर्लंडसारख्या सृष्टिसौंदर्यानें फुलून गेलेल्या देशांत या दोन महात्म्यांची -- एक पूर्वेचा आणि दुसरा पश्चिमेचा -- भेट म्हणजे समसमांचा संयोग होय. ' पूर्व ती पूर्व आणि पश्चिम ती पश्चिम; दोघांचा संयोग कधींहि होणार नाहीं. ' असे उद्गार मदोन्मत्त झालेल्या किपलिंग या इंग्लिश ग्रंथकारानें काढलेले आहेत. रोमन रोलंड आणि महात्मा गांधी हे अशी कांही अपूर्व घटना घडवून आणतील कीं पूर्व आणि पश्चिम यांचाहि मिलाफ होईल!
गांधी आणि रोलंड या दोन महात्म्यांची भेट झाली तरी राष्ट्राराष्ट्रांमधील वैरें कशीं शमतील, जगांत शांतता कशी नांदेल याचा विचार करण्यांकरितां कोणीहि जमत नाहींत. परन्तु सध्यां जगाला युध्दाची धडकी भरली आहे, आणि शांततेची दृढतर उत्कंठा लागली आहे. पुन्हां युध्दाची धुमश्चक्री सुरू झाली तर संबंध मनुष्य जातच रसातळाला जाईल अशी अनेक लोकांना भीति पडली आहे. या दोन महात्म्यांची भेट होऊन जगाची ही भीति थोडीशी तरी कमी होईल काय? जगांत विश्वबंधुत्व पसरावें, सगळया लोकांनी गुण्यागोविंदाने रहावे; सुधारलेले, मागासलेले, पाश्चात्य, पौरस्त्य, इत्यादि सर्व लोकांचा सारखाच उत्कर्ष व्हावा हें दोघांच्या आयुष्याचें ध्येय आहे. जगाला द्वेष, कलह, युध्दें यांची कीड लागली आहे; म्हणून सृष्टि इतकी सुंदर आणि समृध्द असूनहि लोकांना आपत्तीमध्यें दिवस कंठावे लागत आहेत. सत्य आणि अहिंसा यांचे साम्राज्य सर्वत्र पसरलें तर सुख आणि समृध्दि यांची कोणालाहि वाण पडणार नाहीं हा दिव्य संदेश दोघांनाहि सांगावयाचा आहे.
महात्मे हे कोणत्याहि एका देशाचे नसतात. त्यांच्यावर सगळया जगाची सत्ता असते. सगळे देश आणि काळ यांच्याकरितां त्यांचा संदेश असतो. रोमन रोलंड हे फ्रेंच असले आणि महात्मा गांधी हे हिंदी असले तरी जगांतील २०० कोटि लोकांचे डोळे आपल्या उध्दाराकरितां त्यांच्याकडे लागले आहेत. महात्मा गांधींचे चरित्र सर्वांना अवगत आहेच. म्हणून रोमन रोलंड यांच्याविषयीं थोडी माहिती खालीं देतों.
हे दृश्य दाखवून एल्फिन्स्टन म्हणाला, ' बाबासाहेब, तुमची राज्यें नष्ट होण्यास आणि आमचीं स्थापित होण्यास मुख्य कारण काय हें तुमच्या लक्षांत आलेंच असेल. अंमलदाराचा हुकूम आमचे शिपाई प्राण गेला तरी पाळतात, परन्तु तुमचे लोक पळतात.'
वरील गोष्ट खोटी आहे काय? आम्ही युरोपियन लोकांप्रमाणे शिकलेलें सैन्य ठेवूं लागलों, तर ती शिस्त आपल्या सैन्यांत मुरली नव्हती. मैदानी लढायांची आमच्या लोकांस तितकी संवय नसे. शिपायांनी जागा न सोडणें हा मैदानी लढयांतील महत्त्वाचा भाग असतो. समोरासमोरच्या लढाईत सैन्य बेशिस्त झालें कीं, पराजय झालाच. अहमदशहा अब्दालीनें त्यांचे सैन्य जेव्हा पळूं लागलें, तेव्हां त्या पळणारांची मुंडकीं मारण्याचा हुकूम केला. कारण एक पळूं लागला कीं सारे पळूं लागतात. पहिल्या बाजीरावानें वसईच्या हल्ल्याच्या वेळीं एका पत्रांत लिहिले आहें, 'जे मागें फिरतील त्यांची डोकीं परिच्छिन्नपणें मारावी .' सैन्य माघारी न वळणें हें लढाईतील विजयाचें मोठें साधन आहे.
नेपोलियन आपल्या जयाची किल्ली सांगतांना म्हणतो, ' शत्रुपक्षाची चलबिचल झाली आहे, असें मला दिसतांच मी त्यांच्यावर शिलकी सैन्यानें जोराचा हल्ला करीत असें. ' अशी चलबिचल उत्पन्न होऊं न देणें हें मुख्य काम आहे. सैन्य पळूं लागल्यानें ही चलबिचल उत्पन्न होते.
वाटर्लू येथे १८१५ मध्यें इंग्लिश सैन्याचा तळ पडला होता. जर्मन सैन्याची वेळेवर मदत होण्याचें चिन्ह दिसेना. फ्रेंच तर चवताळून आले होते. फ्रेंचांच्या जोरदार हल्ल्यांसमोर आपला टिकाव कसा लागेल याची वेलिंग्टन या इंग्रजी सेनापतीस धास्ती होती.
वेलिंग्टन घोडयावर बसून आपल्या शिपायांच्या रांगांतून हिंडला व म्हणाला, 'माझ्या शिपायांनो, धीर सोडूं नका, जाग्यावरून हलूं नका. आपणांस इंग्लंडातील लोक काय म्हणतील याचा विचार करा.' ते शिपायी वेलिंग्टन यास म्हणाले, 'महाराज, आपण तिळमात्र काळजी करूं नका ; आमचें कर्तव्य आम्ही जाणतों, तें आम्ही नीट पार पाडूं. ' तें कर्तव्य म्हणजे कोणतें, तर सेनापतीनें सांगितल्याप्रमाणें वागणें. नेपोलियननें जर्मन मदत इंग्रजांस येऊन मिळण्यापूर्वी निकराचे हल्ले केले. परन्तु इंग्रज सैन्य मागें गेलें नाहीं ; इंग्रजांची फळी फोडतां आली नाहीं. शेवटी सायंकाळी चारचे सुमारास जर्मन मदत आली व इंग्रज विजयी झाले.
आपलें सैन्य गैरशिस्त, सेनापति कमी दर्जाचे, शस्त्रास्त्रें हिणकस, आणि फंदफितुरी व ऐक्याचा अभाव, इत्यादि कारणसमूहांचा परिणाम म्हणजे आपली राज्यें जाणें व इंग्लिशांचे राज्य होणें होय! आपणांस शिस्त, आज्ञाधारकपणा व ऐक्य या सद्गुणांचे नीट संवर्धन केल्याशिवाय स्वराज्य कसें मिळेल, मिळालें तरी कसें राखता येईल?