“अहो, दंड एक रुपया कीं हजार हा प्रश्न नाहीं. पुष्कळ वेळां श्रीमंतांना एक पै दंड केल्याची उदाहरणे आहेत. त्या पैनेंहीं त्यांची प्रतिष्ठा जाते. त्यांच्या कृत्यावर कांही पांघरून घालीत नाहीं आपण, काय धनजीशेट?” अधिकार्यांनी एटींत विचारलें.
“मी तो बिलकुल निरपराधी. पाप नाहीं केला. सो रुपये द्या म्हणतां देते. परंतु ती शुक्रीच चावट. जंगलांत मला म्हणायची, नवरा ठोकतो, ताडी पितो. तुम्ही सांभाळा. मी पीडा नको म्हटलें. तरी आली. तिला नेऊन सोडून दिलें. या लोकांना खरेंखोटें काहीं नाहीं. रानटी जात. !” धनजीशेट म्हणाले.
“जपून बोला.” बुधा म्हणाला.
“काय जपून बोला ?” धनजीशेट उसळून म्हणाला.
“रानटी आम्हीं नाहीं; तुम्ही आहांत. गरीबांच्या रक्तावर जगणारेंस, बायामाणसांची अब्रू घेणारे. तुम्हांला न्यायनीत नाहीं, दिल्या शब्दाची किंमत नाहीं, केलेल्या वायद्याची, कराराची कदर नाहीं. तुम्हीं रानटी. बंगल्यात राहाणारे, ब्रँडी पिणारे तुम्ही रानटी. आम्ही नाही रानटी. आम्ही देवाला भिऊन वागतो.” बुध्या बोलला.
“जाऊं द्या. झालें गेलें विसरा. मग मजुरीचा नवा दर ठरला ना? धनजीशेट, तुम्ही शंभर रुपये शुक्री किंवा मंगळ्या यांच्याकडे पाठवा. मंगळ्या वगैरे सारे सोडून देण्यांत येतील. संप थांबवा. शान्ति राखा.” अधिकारी म्हणाले.
आदिवासी गेले. बडी मंडळी बसली होती. खादीचा कार्यक्रम होता. चहा, फळफळावळ, बिस्किटें, चिवडा, सारें होते.
“न्याय शेवटीं वर्गदूषितच असतो,” आदिवासी सेवक म्हणाले.
“तुम्हीसुद्धा वर्गयुद्धाची भाषां बोलू लागलांत ? आश्चर्य.” अधिकारी म्हणाले.
“धनजीशेटनीं स्त्रीवर अत्याचार केला. तुम्ही त्यांना शंभर रुपये दंड करतां. गरिबांच्या बायकांची तुमच्या न्यायदेवतेसमोर हीच का किंमत? सर्वत्र हाच प्रकार. अमेरिकेंत एखाद्या नीग्रोनें गोर्या स्त्रीला हात लावला तर त्याला जिवंत जाळतात. परंतु नीग्रो स्त्रियांवर गोर्यांनीं अत्याचार केलें तर ? त्यांना होईल का फाशीची शिक्षा? निदान तुरुंगात ५।१० वर्षें तरी पाठवतील का? ज्यांच्या हातांत पैसा, त्याच्यासाठी न्याय असतो. कायद्यासमोर सारें समान, हें झूट आहे. श्रीमंत पुन्हा वकीलबॅरिस्टर देईल. वाटेल ते सिद्ध करील. गरिबाला कायद्याचा सल्ला द्यायलाही कोणी नसतें. हें सारें फोल आहे.” ते सेवक म्हणाले.
आणि शुक्री कुठें होती ? एके दिवशीं धनजीभाईनें तिला पकडून आणलें. त्याच्या कोंडवाड्यांत ती गाय सांपडली. लांडग्याच्या तावडींत हरिणी सांपडली.
“तूं माझ्याकडे राहा. तो मंगळ्या तुला मारी, ताडी पिई. तूं इथें राहा. तूं माझी राणी तुला कांहीं कमी नाहीं पडणार, पोटभर खायला, सुंदर पातळ, गुलाबाचीं फुलें. राहा येथें शुक्री. “असें तो म्हणाला. तिनें त्याच्या हाताला कडकडून डांस घेतला. धनजी ओरडला. परंतु तो उंची दारू प्यायला होता. त्याच्या पशुतेंत तिच्या सतित्वाचा बळी घेतला.
दिवस जात होते. दंगल वाढणार असें वाटूं लागलें. सरकारनें मध्यस्थी करावी, असें कोणी म्हणूं लागले.
त्या दिवशीं एक सभा होती. सरकारी अधिकारी, जमिनदार, व्यापारी, यांचे पुढारी, आदिवासींचे पुढारी, सारे एकत्र जमले होते. काहीं उदार वृत्तीचे सज्जनहि होते. आदिवासी मंडळीत निरपेक्षपणें सेवा करणारेहि कांहीं होते. बोलणीं सुरू झालीं. मजुरीचा दर काय असावा, याविषयीं चर्चा झाली. तो प्रश्न सुटला.
“आमच्या मायबहिनींची अब्रूहि यांनी घेतली आहे, त्याचें काय? म्हातार्या बुध्यानें विचारलें.
“पुरावा आहे का?” सरकारी अधिकारी म्हणाले.
“पोर झाल्यावर पुरावा.” एक आदिवासी गंभीरपणें दु:खसंतापानें बोलला.
“या धनजीशेटनें पाप केलें कीं नाहीं विचारा. मंगळ्याची शुक्री याच्या पठाणानें पळवून नेली आणि एके दिवशीं रानांत तिला त्यांनी सोडलें. ती रडत होती. जीव देऊं पहात होती. मंगळ्या तुरुगांत. असे हें इंग्रजी राज्य. आमची अब्रू सुरक्षित नाहीं. आम्हीं का जनावरें ?” म्हातारा बुध्या बोलत होता.
“मग आतां म्हणणें काय?” एक जमीनदार म्हणाला.
“न्याय हवा.” बुध्या म्हणाला.
“शुक्रीला शंभर रुपये दंडाचे म्हणून धनजीशेटनें द्यावे.” अधिकारी म्हणाले.
“एखाद्या आदिवासीनें जमीनदाराची बायको पळवली असती तिला भ्रष्ट केलें असतें, तर त्या जमीनदाराच्या बायकोला शंभर रुपये दंड म्हणून आदिवासीनें द्यावे असें तुम्हीं म्हटले असतें का? त्या आदिवासीला तुम्ही पांचसात वर्षांची शिक्षा दिली असती. आदिवासी भगिनींची अब्रू म्हणजे का चार दिडक्या?” एक आदिवासी सेवक म्हणाला.