न करा अल्पही शोक आईबाबा मदर्थ तो
दु:खाची ही नसे गोष्ट पारतंत्र्यास मी धुतो।।
उपाशी बंधु जे कोटी त्यांना अन्न मिळावाया
करिती यत्न जे थोर त्यात गेलो मरोनिया।।
धन्य या निधना माना वदवे मज फार ना
आईबाबा सुखा माना नीर आणा न लोचना।।”
(इतक्यात एकदम एक गाणे ऐकू येते. तेव्हा मुलगा विचारतो.)
“तात, कोठून हे येते गीत ऐकावया बरे
कोण गातो दिव्य गाणे मोहितो मन्मना खरे।।”
(बाप सांगतो)
“बाळ शेजारच्या गेही कवि एक रहातसे
देशाचा ध्यास त्या नित्य पहाटे रोज गातसे।।
स्वातंत्र्याची दिव्य गाणी खिडकीत बसूनिया
गातसे होत तल्लीन वृत्ति ती पावुनी लया।।”
(मुलगा म्हणतो)
“तात ते ऐकु या गीत अपूर्व मज वाटते
अधीर मम हे कान ऐकाया गान दिव्य ते।।”
(स्वातंत्र्यशाहिराचे स्फूर्तीगीत)
समुद्रलाटा अदळताती कविचित्ता ज्या सदा मोहिती
निळे मनोहर सागरपाणी अनंत रत्नांची ती खाणी
अस्तोदय ते रविचे सुंदर दिनरजनी वा प्रशांत अंबर
अनंत तारे सुरम्य इंदु तरुवेलिलता ते दवबिंदु
फुले सुगंधी मुले मनोहर विहंगगण पाखरे खेळकर
मयूर कोकिळ चकोर चातक हरिणपाडसे तैसे हंस
चक्रवाक वा भेसुर घुक गजेंद्र वा ते सिंहशावक
चंचळ चपळा अंबद काळे चपळ वायुचे वेडे चाळे
सरित्सरोवर कमळे सुंदर मिलिंद मंजुल-गुंजारवकर
वने उपवने आम्रबकूल अशोक चंपक कदली मृदुल
पुष्करिणी कारंजी निर्झर चंदनचर्चन माळा सुंदर
हिरवे हिरवे गवत चिमुकले द-या खोल ज्या भिववित डोळे
पहाड मोठे प्रचंड पर्वत नभास शिर जे देउन उचलित
प्रेमे विव्हल रमणी रमण लताकुंज ते प्रेमराधन
चुंबन अलिंगन प्रकार विषयि जनांचे हे शृंगार
काव्य सृष्टिच्या ह्या संसारी मला न गोडी भरे शिसारी
ह्या वस्तूंचा मी ना भक्त यावर मन्मन ना आतक्त
असे भिकारी खरा फकीर ह्या वस्तूंची मज न फिकीर
हृदय कवीचे परी मम आहे प्रबळ भावनावारा वाहे
प्रतिभा स्फुरते मदंतरंगी काव्य नाचते मनस्तरंगी
चिता भडकली मदीय चित्ती गीत थरथरे ओठावरती
गीत कशाचे? मद्देशाचे स्वातंत्र्याचे समानतेचे
स्वतंत्रतेची गाइन गाणी जनात अथवा निर्जन रानी
स्वतंत्रतेचे विचार-वारे वातावरणी भरीन सारे
स्वातंत्र्याचे रणसंग्राम हृदयोद्दीपक जगदभिराम
स्वातंत्र्याचे झगडे भीषण जेथे चाले मारण मरण
त्यांची गाणी विशंक गाइन तदभक्तांची गाणी गाइन
प्राण अर्पिले ज्या वीरांनी त्यांना गुंफिन माझ्या कवनी
स्वतंत्रतेचा मी शाहीर करीत आहे जगजाहीर
नसानसांतुन ओतिन जोम स्वार्थाचा मग कराल होम
सिंहाचे परि तुम्ही उठाल धीर गर्जना तुम्ही कराल
देशभक्तिचा प्रवाहपूर खळखळाट वाहवीन धीर
देशभक्तिचा सागर खोल हृदयी निर्मिल माझा बोल
कठोर हृदये मृदु नवनीते करितिल माझी नवीन गीते
मृदु नवनीता वज्र करीन दिव्य असे मी निर्मिन कवन
पाषाणाला फोडिल पाझर ऐसे निर्मिन वाक्कल्लोळ
वेदजडांची वृत्ति हलेल ऐसे निर्मिन काव्य रसाळ
षंढहि होतिल रणझुंजार ऐसा ओतिन कवनी जोर
त्यागा उन्मुख मरणा सन्मुख मानितील त्यामध्ये खरे सुख
अशी जनांची वृत्ती करीन स्वातंत्र्याची गीते निर्मुन
होय, कशाला विचारता रे स्वातंत्र्याचा असे कवी रे
हसा, हसा, परि रडाल अंती मदध्येयाची मला संगती
स्वातंत्र्याचे सरोवरात मरालिनी मत्कविता रमत
स्वातंत्र्याचे सुमंदिरात विचार माझे सदैव गुंगत
स्वातंत्र्याचे स्वर्गीमाजी सदैव चमके प्रतिभा माझी
स्वातंत्र्याचे नभोवितान तेथे घेतो मी उड्डाण
स्वातंत्र्याचे विशाल गगन तेथे घेतो विशंक तान
स्वतंत्रतेचा, मायभूमिचा प्रियकर माझ्या भारतभूचा
पवित्र माझ्या भारतभूचा उज्ज्वल माझ्या भारतभूचा
मंगलतम मम भारतभूचा स्वातंत्र्योन्मुख भारतभूचा
कवी असे मी धीर नवीन सदैव पूजिन भारत-चरण
भारतभूची मंगल धुळी सतत माझ्या भाळी
भारतमाते तव शुभ गान मजला वाटे अमृतपान
तुलाच गाइन तुलाच ध्याइन तुलाच वंदिन मी गहिवरुन
हीच प्रतिज्ञा माझी माते पुरवी प्रेमाकरे अमृते
त्वांवंदेऽहम् तवैव गेऽहम्
असे बोलून तो दिव्य धीर गंभीर उत्कट
निघतो मरण्यासाठी तेज:संदीप्त उद्धट।।
माते, रात्रंदिन तळमळे थोर गांधी महात्मा
भूमातेची बघुन विपदा तो जळे अंतरात्मा।।
वार्धक्यीही अनुपम तपे पेटवी राष्ट्र सर्व
कष्टे मोठ्या भरतभुवनी आणिती मोक्षपर्व।।
मोठ्या कष्टे जशि भगिरथे आणिली मर्त्यलोका
स्वर्गंगा, तत्कृतिसम महात्मा करी हे विलोका
आणयाते किति तरि महायास स्वातंत्र्यगंगा
तत्त्यागाला मिति न तुलना निश्चया ना अभंगा।।
आई पूर्वी सुखरत असे जे विलासी अमीर
देशासाठी त्यजुन सगळे आज होती फकीर
लोळावे गे पसरुनी मऊ गादिगिर्दी पलंगी
देशासाठी उठुन बनती आइ ते झाडु भंगी।।
जाते कारागृहि सकळ ते नेहरूंचे कुटुंब
देशप्रीती हृदयि भरली शुद्ध त्यांच्या तुडुंब
होते लाखोपति परि भिकारी जवाहीरलाल
देशासाठी श्रमति किति, ते जसे लाल बाल।।
टाकावे गे मजसम तुवा कोटि ओवाळुनिया
आई! ज्यांचेवरुन मरती देति ते स्वीय काया
मायामोहा तुडवुन अम्हां देशकार्यार्थ जाणे
प्राणा देणे गुणगुणत गे अंतरी दिव्य गाणे।।
जो जो आहे तरुण म्हणुनी त्यास ना राहवेल
सौख्ये त्याला विषसम, पलंगी तया आगलोळ
दीपी घाली उडिस निकरे त्या पतंगासमान
जावू धावू भडकलि चिता देउ देशार्थ प्राण।।
तारुण्याचे समयि असते वृत्ति नि:स्वार्थ माते
तेजस्वी जे झणि रुचत ते मोहिते अंतराते
भीती चित्ता तिळ न शिवते भावनाही उदार
माते, ऐशा तरुण युवकांचेवरी देशभार।।
देशोदेशी तरुण करिती क्रांती ताता सदैव
त्यांचे हाती जननि असते सर्वदा देश-दैव
तुर्कस्थानी तशिच रशियामाजि तैशी चिनात
केली क्रांती तरुण युवकी तत्त्व आणा मनात।।
होतो अग्रेसर तरुण जो, वृद्ध तो पाय ओढी
उन्मात्ताते तरुण नमवी, वृद्ध त्या हात जोडी
उत्साहाते तरुण वरितो, वृद्ध नैराश्यवादी
स्वतंत्र्याते तरुण वितरी, वृद्ध तो नित्य बांधी
भूमातेला सतत विपदी अस्मदाधार एक
आम्ही तीते सजवु करुनी आमुचा रक्तसेक
देशामाजी तरुण जन ज्या कल्पना बाळगीती
तैसी देशस्थिति बनतसे सांगती वंद्य मर्ती।।
‘माझ्यासाठी मरतिल मुदे पुत्र माझे’ जपान
बोले, तेवी वदति सगळे अन्यही देश जाण
ऐशी प्रौढी परि न वदता येइ या भारताला
आई आम्हां तरुणतरुणां लागला डाग काळा।।
भूमातेच्या बघुनि विपदा चैन ना गे पडावे
तद्दास्याला झणि चुरडण्या आइ आम्ही मरावे
आनंदाने निज तनु सुखे मातासेवेस द्यावी
काळोखी जी निजशुभयशा लागली ती पुसावी।।
तान्हाजीची कृति कशि? अम्हां काय बोलेल बाजी?
आई, सारे वरुन वदती ‘प्राण द्या मातृकाजी’
आलिंगावे निज सुत तया राखणे गे घरात
आईबाबा परम अघ ते घ्या विचारा मनात।।
आई वातावरण भरले दिव्य- विद्युत्प्रवाहे
राहे गेही कवण युव तो आज गे सौख्यमोहे
नाही तो गे तरुण, दिसतो वृद्ध नामर्द षंढ
राहे स्वस्थ स्वगृहि जरि है पेटता यज्ञकुंड।।
यावी स्फूर्ति प्रबळ-तर ती रक्त ते सळसळावे
भूमातेच्यास्तव मृति वरावयासआम्ही उठावे
राहो ना ती अशनशयनाची स्मृती अंतरंगा
वेडावोनी अम्हि जननीच्या धावणे बंधभंगा।।
नांदे गेही जननि सुत जो आजला खातपीत
आलापीत स्वनित कवने तो पशू गे खचित
नीच प्राणी परम तदध:पात गे जन्म सात
मातेच्या उद्धृतिसमयि जो लक्ष तेहि न देत।।
आई माझ्याहुन कितिक ते कोवळे सान बाळ
हालांमध्ये हसत असती नाहि का गे कमाल?
‘देशासाठी तनु झिजवु ही’ बाळ ते बोलताती!
मोठ्यांच्याही वच परिसुनी अश्रु नेत्रांत येती।।
स्वातंत्र्याची घुमघुमतसे भारती आज भेरी
व्हावे जागे झणि तरि अता, झोपलो अवेरी
माते, माते अडविशि कशी पाडिशी केवि मोह?
देशद्रोहा करु म्हणशि का? मी असे घट्ट लोह।।
मायापाशी झटदिशि झुगारुन देतात बंधू
होती सिद्ध प्रमुदित मने तो जरि क्लेश-सिंधू
गेही राहू? मरण बरवे त्याहुनी ते विशंक
लावू कैसा प्रियभरतभूमायिला मी कलंक।।
प्राणत्यागे निजयश टिको, नीति ही पूर्वजांची
रोमी रोमी भरलि अमुच्या गोष्ट ही सत्य साची
देऊ प्राणां फिकिर न करु सोडु ना स्वाभिमान
सत्त्वासाठी करित असती थोर ते देहदान।।