न बोलवे तृप्ति म ती बघून
भरेच पाणी नयनी फिरुन
पुन:पुन्हा लोचन ते पुसून
तयास ठेवी मनि साठवून।।
पिते जणू बाळकरुप आई
पिताहि साश्रु स्वसुतास पाही
उचंबळे वत्सलता अनंत
न वर्णनाला कवि हा समर्थ।।
पुन: पुन्हा बाळक-मूर्ति पाही
न तृप्ति ती मातृमनास होई
‘मदीय माते! मम वेळ आली’।।
वदून ती मूर्ति अदृश्य झाली।।
टवटवीत ती तरुची पाने। विहंग गाती मंजुळ गाणे
सृष्टी सांगते दु:ख गिळावे। कर्तव्यास्तव पुन्हा उठावे।।
माझी पत्री
कुठुन आणू सुमने सुवासी
उदार माते तव पूजनासी
न बाग येईल कधी फुलून
सुपुष्प-रोपे जळती सुकून।।
जुई न जाई न गुलाब राही
न मोगरा गे निशिगंध नाही
न पारिजाते न टिके बकूल
न रोप ते एकहि गे जगेल।।
कुठून आणू बहुमोल पाने
प्रयत्न केले किति लेकराने
जगे न आई तुलसी न वेल
जळेल दूर्वींकुर ना हसेल।।
सुपुष्प नाही न पवित्र पान
सदैव खालीच मदीय मान
सदैव माझी परडी रिकामी
श्रमूनिही बाग बये निकामी।।
मदंतरांतील उदंड पाणी
अखंड देतो नयनी भरोनी
तरी न ही बाग फुलून येई
बघू किती वाट मनात आई।।
करावयाला तव पूजनाला
किती परी उत्कटता मनाला
किती तरी दाबु कितीक रोधु
किती सदा मी समजावू बोधू।।
न वाट आता बघतो कशाची
कुचंबणा ना करितो मनाची
असेल बागेत मदीय जे जे
समर्पितो ते तव पादपूजे।।
अनंत-मालिन्ययुते विशीर्णे
निरस्त-तेजे कृश हीन दीने
कशीतरी ही परडीत पाने
करून गोळा भरिली मुलाने।।
मदंतरांतील अपार पाणी
सुदीन पानांवर शिंपडोनी
करुन मी निर्मळ आणिली ही
करुन घे गोड तयांस आई।।
हसोत सारे मम पूजनाला
न तू हसावे जननी मुलाला
भिकार माझी म्हण तू न पत्री
समर्पितो जी चरणी पवित्री।।
-पुणे, २७ फेब्रुवारी १९३५
मृदु मधुर त-हेने वागवावे मुलीला
सहज कधि मदीय ध्येयही सांग तीला
हसत शिकत मोठी नीट होईल जेव्हा
भवजलधिमधूनी पार जाईल तेव्हा।।
परत जरि कराया वाटला तो विवाह
तरि परम सुखाने तो करो सौख्यवाह
गमत अपरिणीता बालिका आइ माते
करुनि निजविवाहा सेवुदे सन्मुखाते।।
जरि करिल विवाहा पाप ना ते गणावे
उलट विमल धर्मा अंगिकारी म्हणावे
तुम्हि तिजसि सुखाने संमति स्वीय द्यावी
मति करपुन आई ती तदीया न जावी।।
करणे क्षम तुम्हि तन्मति
निज कर्तव्य करावयाप्रती
मग बोल तुम्हास तो नसे
जननी मी वदु काय फारसे”
(माता गदगदून बोलते)
“करि न लवहि चिंता बाळ मी वाढवीन
तव करुण वधूला सर्वदा मी जपेन
हृदय न दुखवीन प्राण गेल्याहि माझा
तुझिच शपथ माझ्या मोहन प्रेमराजा
नयन बुबुळ तेवी तीस मानीन नित्य
सुखविन शिकवीन प्रेम देईन सत्य
मुळि न मनि करावी बाळ वेल्हाळ खंत
जरि जगति मदीया अश्रुला ती न अंत
जमले जल लोचनामधी
किति हेलावुन ये हृदंबुधी
पदरे झणि ती पुशी परी
मग गांभीर्य वरी मुखावरी।।”
(आईच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू जमलेले पाहून मुलगा शेवटचे सांगतो)
किति मी समजाविले तुला
न रडे देइ निरोप तू मुला
नच मोहदरीत तू पडे
परि कर्तव्यगिरीवरी चढे।।
धरि धीर मनात गाढसा
न रडावे जननी ढसाढसा
जगता सुखवी सदा सये
किति मी सांगु बरे तुला बये।।
रडणे प्रभुजीस नावडे
रडणे द्रोह तदीय तो घडे
हसुनी मज दे निरोप तो
मरणाने तव पुत्र शोभतो।।
मृति ही सदलंकृती मला
मृति देते मज किर्ति निर्मळा
सुत धन्य खराच जाहला
जननी तू करि थोर सोहळा।।
करुनी निज नेत्र कोरडे
निज कर्तव्य करावया पुढे
झणि सिद्ध विशंक आइ हो
मति मोदे तव दु:ख हे सहो।।”
(मातेचे म्हणणे)
“ठेवून हृदयी तूते स्मरुन त्वद्वचा सदा
हृदयी भगवंताच्या धरुनी पावना पदा।।
प्रेमस्नेहामृताचा मी सुकाळ धरणीवरी
करीन बाळका नित्य वाक्य हे हृदय धरी।।
येईल लोचनी पाणी त्वत्स्मृती मज येउन
कर्तव्य करण्यासाठी पुसून परि टाकिन।।
दोन ही पिकली पाने श्रमुनी गळती यदा
भोटाया तुजला येऊ बघाया प्रर्भुच्या पदा।।”
(मुलगा म्हणतो)
“मोहतिमिर नाशाया आला देवाचा हा बाळ
आई बाबा निरोप द्यावा देव करिल सांभाळ
येतो बाळ अता
सुखवा भारतमाता। येतो बाळ अता।।
(मुलगा आता कायमचा जाणार हा विचार मनात येऊन मातेला फार दु:ख होते. ती मुलाला सदगदित होऊन म्हणते-)
आपार पान्हा हृदयात हाटे
आपार पाणी नयनांत लोटे
पुसूनिया ती परि लोचनांस
अतीव कष्टे वदते मुलास।।
“उभा राहा नीट जरा समोर
गड्या तुला पाहिन एकवार
असे तुझे दर्शन शेवटील
पुन्हा न ते ह्या भुवनी मिळेल”।।
समोर येऊन सुपुत्र राही
तयास माता अनिमेष पाही
बघू न देती भरतीच डोळे
पुशी, पुन्हा ते बनतीच ओले।।