“कल्याण, आपण जाऊं या दुसरीकडे. त्या म्हाता-याला कशाला त्रास ? रागावून काय होणार ? आपण त्यांची कींव करूं या. आपला देश किती मागं आहे त्याची यावरून कल्पना येईल; यापेक्षां किसान कामगारहि जरा धीट असतात. असं कसं हें पुणं ? आणि ही म्हणे महाराष्ट्राच्या राजकारणाची राजधानी !” भाईजी म्हणाले.
इतक्यांत त्या म्हाता-याची पत्नी आली. ती गोड बोलून सांगूं लागली. तिला वाईट वाटत होतें. तिनें नव-याची समजूत घालण्याचाहि प्रयत्न केला, परंतु तिला यश आलें नाहीं. ती विश्वासला म्हणाली, “हें पाहा विश्वास, तुम्ही उद्यांच जा असं नाहीं. चार दिशीं गेलेत, तरी चालेल. चांगली जागा मिळेपर्यंत राहा हो. परंतु कुठं तरी दुसरीकडे जागा बघा. त्यांचा स्वभाव हा असा. वयहि झालं. कशाला त्यांना त्रास देतां ? इथं पुन्हां दुसरं कोणी नाहीं कीं पोलीसबिलीस आले तर त्यांना जरा कोणी दरडावील; खरं ना ? मला वाटलं कीं चांगला आधार व शेजार आला मुलांचा. घर भरलेलं दिसेल. जा-ये सुरू राहील. आम्ही घरांत दोघं. सारं सुनं सुनं वाटतं. तुम्हांला भाजीसुध्दां दुपारची ठेवून दिली आहे; मुद्दाम थोडी जास्त केली होती. म्हटलं, होईल मुलांना; हातांनीं करतात. तिची बरी आहे ना प्रकृति ? जरा संभाळा हो. वाईट झालं. तुम्ही सारे दु:खांत मी समजतें; परंतु काय करायचं ? चार दिशीं गेलेत तरी चालेल हो.”
असें म्हणून ती म्हातारी गेली. विश्वास तिला नाहीं म्हणूं शकला नाहीं. म्हाता-याचा त्याला राग आला. परंतु या म्हाता-याच्या पत्नीचें बोलणें कसें सरळ ! तिनें भाजीहि त्यांच्यासाठीं ठेवून दिली होती ! तिला हीं मुलें जावीं असें वाटत नव्हतें. परंतु नवरा म्हातारा. उगीच मनाला लावून घ्यायचा म्हणूनहि तिला काळजी.
विश्वास व कल्याण दुपारीं पुन्हां फिरतीस जायला निघाले. परंतु भाईजी म्हणाले, “कल्याण, जें घर पाहाल, तिथं आधीं सांगून ठेवा कीं, “कदाचित् आमची चौकशी करण्याला पोलीस येतील. तुम्हांला तसा त्रास नाहीं. परंतु लगेच उठवा बि-हाड म्हणाल; द्यायची असेल जागा तर द्या,” असं हडसूनखडसून मग ठरवा घर. नाहीं तर रोज सामान न्यायचं, नीट लावायचं आणि पुन्हां उचलायचं, असं किती दिवस करणार ?”
“दादा, वैनीकडे तुला नाहीं का जायचं ?” रंगानें विचारलें.
“आतां आधीं घर जातों पाहायला, चारपांच वाजल्यानंतर संध्येकडे जाईन. हरणी व बाळची आई जाणारच आहेत. भाईजी, भात निराळा करून ठेवा. तूपभात व लोणचं घेऊन जाईन. तुम्ही जरा विश्रांति घ्या. आमच्यासाठीं तुम्हांला ही दगदग.” कल्याण काकुळतीनें म्हणाला.
“कल्याण, पुन्हां असें बोलणार असशील तर मी आजच निघून जातों. माझ्यामुळं तुम्हांला आभार का वाटतात ? कितीदां सांगायचं कीं माझे व तुमचे संबंध केवळ औपचारिक नाहींत.” भाईजींना वाईट वाटून ते बोलले.
“भाईजी, आभार नाहीं हो वाटत. परंतु तुम्ही किती काम करतां, आम्हांला कांहींच का वाटणार नाहीं ? जातों हं आम्ही.” असें म्हणून कल्याण व विश्वास गेले. रंगाहि निघून गेला. भाईजी तें भाषांतर पुरें करीत बसले. त्यांना आतां येथून जावें असें वाटूं लागलें. आपला आणखी यांच्यावर भार कशाला ? त्यांच्याहि जवळचे पैसे संपत आले होते. पुढें या सर्वांचं कसें होईल, कोठें राहतील, काय खातील, भाडें कोठून देतील ? किती तरी विचार त्यांच्या मनांत आले. आपण जावें कोठें तरी, रोज भिक्षा मागावी व मिळेल तें या तरुणांना पाठवावें, असें त्यांच्या मनांत आलें. तें भाषांतर तसेंच ठेवून ते या खोलींत येरझारा करीत राहिले.
तिस-या प्रहरीं कल्याण व विश्वास घरीं आले. दोनतीन तास ते हिंडहिंड हिंडले. अनेक घरें त्यांनीं ठोठावलीं. परंतु यश आलें नाहीं. कंटाळून ते घरीं आले, अंथरुणावर पडले.
“विश्वास, मिळाली का जागा ?” भाईजींनीं विचारलें.
“या पुण्यांत जागा मिळणं शक्य नाहीं.” कल्याण म्हणाला.
“नमस्कार असो या पुण्याला !” विश्वास संतापानें म्हणाला.
“नाहीं का मिळत घर ?”
“नाहीं मिळत. तुमच्या सल्ल्याप्रमाणं वागूं तर कुठंहि घर मिळणार नाहीं. अनेक घरांतून गेलों. भाडं वगैरे सारं ठरे. परंतु “पोलीस वगैरे येतील हो एखादे” असं आम्ही म्हणतांच “तर मग नको” असं म्हणत. काय करायचं ?” विश्वास म्हणाला.
विश्वास त्याच्याबरोबर गेला. दोघांचें कांहीं तरी बोलणें सुरू झालें. हळूहळू आवाज मोठा होत गेला. विश्वास रागानें बोलत होता. आतां कल्याणहि उठून तेथे गेला. सर्वांचें चांगलेंच भांडण जुंपलें.
“अहो, आज इथं आलों नाहीं तों का पुन्हां जायला सांगतां ? हा काय चावटपणा ? एक महिना तरी आम्ही इथंच राहणार. इथून आम्ही जाणार नाहीं. काय करायचं असेल तें करा. नोटिस द्या आधीं. जा म्हणून तुम्हांला सांगवतं तरी कसं ?” विश्वास म्हणाला.
“अहो, मी पेन्शनर माणूस. माझीं मुलं तिकडे मुंबईला नोकरीचाकरीला आहेत. इथं फक्त ती नि मी. दोघं म्हातारीं माणसं. ते मघां पोलीस आले व विचारू लागले. सांगितलं त्यांना कीं आलं आहे खरं बि-हाड. ते तीनदां तीनदां दाराशीं येतात. आजपर्यंत या घरांत कधीं पोलीस आला नाहीं. आम्हांला या गोष्टींची संवयच नाहीं. शिवाय जगांत लढाई सुरू झालेली. आपलं सरकार लढाईंत पडलेलं. आणि त्यांतून आम्ही पेन्शनर. अहो, एकदम पेन्शहि हे बंद करायचे हो. कांहीं न्याय का राहिला आहे या राज्यांत ? तुम्हांला आम्हीं जागा दिली, हाच भयंकर गुन्हा असं म्हणायचे. म्हणून म्हणतों कीं तुम्ही आपले जा. पुण्याला वाटेल तितक्या तुम्हांला जागा मिळतील. किती तरी नवीन जागा पर्वतीच्या बाजूला झाल्या आहेत. कृपा करा.” तो म्हातारा पेन्शनर सांगत होता.
“अहो, पण तुम्ही सुशिक्षित आहांत नि असे काय घाबरतां ? सरकारनं असं का जाहीर केलं आहे कीं, आम्हांला कोणी घर देऊं नये ? जर कोणी बि-हाडाला जागा देईल त्याला दंड होईल, शिक्षा होईल, असं का सरकारी फर्मान निघालं आहे ? उगीच कां तुम्ही भिता ? आले पोलीस तर येतील आमच्या खोलींत. तुमचं घर का जप्त होणार आहे ?” विश्वास समजावून सांगत होता.
“तसा मी भित्रा नाहीं हो. अहो, माझे चुलते टिळकांच्या राजकारणांत होते. परंतु आतां मी म्हातारा झालों आहें. म्हणून म्हणतों, कीं उगीच नको. तुम्हां तरुणांचं तसं मला कौतुक वाटतं. मीहि आज तरुण असतों, तर तुमच्याबरोबर राहिलों असतों. परंतु वय झालं. आतां चळवळ सुरू होईल असंहि म्हणतात. धरपकडी होतील. आपल्या देशाची तयारीच नाहीं. वास्तविक अशा वेळीं देश स्वतंत्र करायची संधि असते. लोकमान्य असते, तर आज देश स्वतंत्र करते. परंतु टिळक, एकच पुरुष झाला. अहो, मी चुलत्यांबरोबर जायचा त्यांच्याकडे. काय त्या चर्चा व तीं खलबतं. मग केव्हां जातां तुम्ही ? उद्यां गेलेत तरी चालेल. परंतु जा बुवा. वाईट वाटतं मला सांगायला. परंतु आमचं वय झालं. हे पोलीस नको यायला दारांत. सर्व आयुष्यांत जें पाहिलं नाहीं, तें म्हातारपणीं नको पाहायला.”
“आम्ही कांहीं जाणार नाहीं; हा काय फाल्तूपणा ? पोलीस आणा व काढा आम्हांला बाहेर !” कल्याण म्हणाला.
“आम्हीं विश्वासानं तुम्हांला जागा दिली. परंतु तुम्ही असे असाल हें काय बरं आम्हांला माहीत ? जरा शंका आली, कीं हे रात्रीचं सामान कां आणतात ? परंतु म्हटलं दु:खांत आहेत. वेळ नसेल जात. आणीत असतील सामान. पण जेव्हां सकाळी पोलीस आले. तेव्हां प्रकाश पडला. तुम्ही आधींच सांगतेत, तर मीं जागा दिली नसती. इतके दिवस रिकामी आहे, आणखी काहीं दिवस पडती. आणि भाडयाचा लोभ थोडाच आहे मला ? चांगली पेन्शन आहे. मुलं चांगलीं रोजगारी आहेत. परंतु म्हटलं सोबत होईल. आम्ही दोन पिकलीं पानं घरांत. हांक मारायलाहि कुणी नाहीं. तुम्ही बरेच मित्र मित्र होतां. बरं झालं असतं. आमच्या हिला तर काल तुम्ही बोलत होतेत तिच्याजवळ तर किती बरं वाटलं. म्हणाली, कशीं छान आहेत मुलं. परंतु उपयोग काय ? तुम्ही हे असे उपद्व्यापी. कांही करा. जा. या पांढ-या केंसांची तुम्हांला प्रार्थना आहे.” म्हातारा गयावया करून म्हणाला.
कल्याण व विश्वास खोलींत आले. रंगाहि खूप रागावला होता. काल येथें सामान आणलें. आतां आज पुन्हां कोठें मिरवणूक काढायची ? आणि नवीन घर पाहूं तेथेंहि हेच प्रकार झाले तर ? कोठें तरी ठाण मांडून बसलेंच पाहिजे. हा काय चावटपणा ! असे त्यांचे विचार चालू होते.