लग्न करा असे श्रीनिवासरावांस पुन्हा कधी कोणी बोलले नाही. परंतु श्रीनिवासरावांची इस्टेट? मिनीचे लग्न करून का कोणाला घरजावई करणार व त्याला सार्या इस्टेटीचे बक्षीसपत्र देणार? का कोणाला दत्तक घेणार? दत्तक घेण्यासंबंधी सूचना त्यांच्या कानावर येत. परंतु ते लक्ष देत नसत. एकदा तर ते म्हणाले, ''एखादा मुलगा दत्तक घेण्यापेक्षा एखाद्या संस्थेला सारी इस्टेट का देऊ नये? एकदा एक मिशनरी म्हणाला होता,''आमच्याकडे दत्तकपध्दती नाही, म्हणून कोटयावधी फंड आमच्या संस्थांना मिळू शकतो.'' परंतु आमच्याकडे हे दत्तकाचे खुळ आहे. परंपरा चालविणे पवित्र खरे, परंतु काळवेळही पाहिला पाहिजे. आज देशाच्या कल्याणासाठी झटणार्या शेकडो संस्था उभ्या राहत आहेत. या देशाचा फाटका संसार सुधारण्यासाठी त्या खटपट करीत आहेत. त्या संस्था मरू देणे म्हणजे पूज्य पूर्वजांशीही द्रोह आहे. पूर्वजांची परंपरा चालविण्यासाठी आधी देश जगला पाहिजे आणि म्हणून त्या देशाला जगवू पाहणार्या संस्था जगविल्या पाहिजेत. खादी संघ, हरिजनसेवक संघ, हिंदी-प्रचार-समिती, गोरक्षण, व्यायामप्रसार, साक्षरताप्रसार, शेकडो संस्था आहेत; कोणाला आहे त्याची पदोपदी आठवण? माझी इस्टेट मी तिथे का देऊ नये? आणि ही इस्टेट माझी तरी कशी? काय माझा अधिकार? ही शेतभाते कोणाची? शेतकर्यांची; ती त्यांना मी का देऊ नयेत? ज्यांना जमीन नाही अशा हरिजनांना ती का देऊ नयेत? माझे, काय आहे माझे? संपत्ती गादीवर लोळून निर्माण करता येत नसते.''
''व्यापारी हजाराचे दहा हजार, लाखाचे दहा लाख गादीवर बसून करतात. आम्हाला दिसतं.'' कोणी म्हणत.
परंतु श्रीनिवासराव सांगत, ''ते लाखाचे दहा लाख करीत असतील. परंतु त्याचा अर्थ काय? दुसर्याच्या खिशातील दहा लाख त्यांनी कमी केले. जगातील संपत्तीत त्यांनी भर घातली का? संपत्ती त्यांच्या वहीत होती. ती यांच्या वहीत आली. एखाद्या शेटजीला एक गिरणी उभारून तेथे बसू दे. ते एक धुराचे नळकांडे करू दे सुरू, गिरणीत नऊ-नऊ तास काम करून मरणारे कामगार तिथे नसतील तर संपत्ती होईल का निर्माण? शेतात श्रमून-राबून शेतकरी कापूस, शेंगा, धान्य न निर्मील तर व्यापारी गाद्यांवर बसून भाव करीत बसले तरी का संपत्ती तिजोरीत येणार आहे? संपत्ती श्रमातून निर्माण होते. ती श्रम करणार्याजवळ राहत नाही. ती लुबाडली जाते, अन्यत्र नेली जाते, ते श्रमणारे उपाशी राहतात. खरोखरीच ही माझी इस्टेट म्हणायला मला लाज वाटते. एखादे वेळेस हा मोठा सुंदर वाडा मला लाखो जीवांच्या संसाराची होळी करून बांधला आहे असं वाटतं. क्षणात हे सारं वैभव भिरकावून द्यावं असं वाटतं. परंतु मोह आहे. मोह तोडणं महाकर्म कठीण !''
एखादा मृत्युंजय शिवशंकरच, वैराग्याचे भस्म अंगाला फासलेला, ज्ञानगंगा ज्याच्या मस्तकातून स्रवत आहे, शीलाचा चंद्रमा ज्याच्या भाळी मिरवत आहे, पवित्र निश्चयाचा तिसरा डोळा ज्याचा उघडलेला आहे, असा तो योगियांचा राणाच श्रीनिवासांच्या रूपाने बोलत आहे असे त्या वेळेस वाटे. त्यांच्या डोळयांत त्या वेळेस एक अशा प्रकारचे तेज चमके की, दुसर्यांच्या जीवनास थोडेफार तरी पेटविल्याशिवाय राहत नसे.
श्रीनिवासरावांच्या हृदयाचा थांग लागणे कठीण. त्यांना मिनीचे बंधन नसते तर ते केव्हाच हिमालयात गेले असते. लाकडे पोखरणार्या भ्रमराला एक कोमल कमळ गुंतवून ठेवते, पकडून ठेवते, कोंडून ठेवते. मिनीची ती जीवनकळी, त्या कलिकेसाठी श्रीनिवासराव जगत होते. ते मिनीची सारे करायचे. मिनीची सेवा करताना त्यांना धन्य वाटे. मातृप्रेम व पितृप्रेम या दोहोंचा आनंद ते मिनीला देत. ''मिने, मी तुझे केस विंचरतो. त्यात फूल खोवतो.'' ते म्हणावयाचे. मीना गोड हसे, ''मिने, तुला भरवू? मोठी झाली म्हणून काय झालं? देऊ का तुला भात कालवून?'' असे म्हणायचे. मिनी गोड हसे.
तिला कोणी मीना म्हणत, मिनी म्हणत.
श्रीमंती बापाची एकुलती एक ती मुलगी. पुन्हा बाई लहानपणीच निवर्तलेली. श्रीनिवासरावांनी पुन्हा लग्न केले नाही. गडगंज संपत्ती होती. आजूबाजूचे टोळभैरव सांगावयाचे, ''तुम्ही पुन्हा लग्न करा. एवढया इस्टेटीचा मालक कोण? का चोरापोरांपायी तिची विल्हेवाट लावली जावी असं तुम्हाला वाटतं? लग्न करण्याचं अद्याप वय आहे आणि आपल्या देशात पैसे असले म्हणजे वाटेल त्या वयात नवी नवरी मिळू शकते.'' परंतु श्रीनिवासराव गंभीर राहत.
''लग्न एकदाच लागत असतं. पुनः पुन्हा लग्न लावणार्यांना लग्नाचा गंभीरपणा, पवित्रपणा समजत नाही असे मला वाटतं.'' ते म्हणत.
''ज्या मुलामुलींची लहानपणीच लग्न लागली, ज्यांनी संसार काय ते अनुभवले नाही, लग्न काय ज्यांना कळले नाही, त्यांच्यातील जर कोणी लहानपणीच मेलं तर त्यांनी काय करावयाचं?'' असा एकदा एकाने श्रीनिवासरावांना प्रश्न केला होता. त्या वेळी ते म्हणाले, ''आता अशी लग्नं फार होत नाहीत. परंतु समजा, नवरा लहान असताना त्याची वधू वारली किंवा वधू लहान असताना तिचा पती वारला, तर त्यांची निःशंकपणे पुन्हा लग्नं लावावीत. वास्तविक ते विवाहच नव्हेत. विवाहातील प्रतिज्ञांचे अर्थ त्यांना कळत होते का? विवाह नव्हते-ती गंमत होती. ती वेडया आईबापांची हौस होती. परंतु ज्यांची लग्नं मोठेपणी झाली किंवा लहानपणी होऊनही जी वधू-वरे वयात राहूनही एकत्र राहिली सवरली, त्यांना माझ्या दृष्टीनं पुन्हा विवाह नाही. पतिपत्नींची परस्परांस ओळख झाली आहे, मूलबाळ झालं आहे. एकमेकांच्या जीवनात एकमेक शिरली आहेत, अशांना कोणतं पुन्हा लग्न?''
''परंतु अद्याप शांत-काम ती झाली नसतील तर? वेडेवाकडे पाऊल पडण्यापेक्षा संरक्षण म्हणून पुन्हा लग्न करून संयमी जीवनाचा मर्गा पत्करणं श्रेयस्कर नाही का? अतिउच्च ध्येय डोळयांसमोर ठेवून पतित होण्यापेक्षा-दरीत पडण्यापेक्षा-मर्यादित ध्येय डोळयांसमोर ठेवून थोडयाशा तरी उंचीवर भक्कम पावलं रोवीत जाऊन उभं राहणं योग्य नाही का?''
अशा प्रश्नाला श्रीनिवासराव उत्तर देत, ''तुमचं म्हणणं मला मान्य आहे. ज्यांना तसं राहणं अशक्य वाटत असेल त्यांनी पुन्हा विवाह करावेत. परंतु प्रथम पत्नीच्या प्रेमाचा या जन्मीच नाही तर जन्मोजन्मी पुरेल इतका सुगंध ज्यांच्या जीवनात भरून राहिला आहे, तो त्या सुगंधाच्या सामर्थ्यानं तरून जाईल. पतीच्या जीवनातील अमर माधुरी जिनं चाखली असेल, तिला दुसर्या संरक्षणाची जरूरी नाही. मिनीची आई माझ्या जीवनात भरून राहिली आहे. ती मेली असे मला जणू वाटत नाही. जिवंतपणी ती माझी होती. त्यापेक्षाही अनंतपटीनं आज ती माझी झाली आहे. जिवंतपणी आमच्या प्रेमैक्यात थोडा तरी पार्थिवतेचा अंश होता. परंतु आज केवळ चिन्मय अभंग निर्मळ नाते जोडलले आहे. माझे हृदय फाडून दाखविता आलं असतं, तर तिथे मिनीची आई प्रेमवीणा वाजवीत बसलेली तुम्हाला दिसली असती.''
श्रीनिवासराव असे बोलत व शेवटी त्यांचा गळा भरून येई. डोळे भरून येत. ती चर्चा त्यांना असह्य होई. ते पटकन् उठून जात व शयनमंदिरातील मिनीच्या आईच्या तसबिरीसमोर थरथरत उभे राहत. क्षणभर तेथे बसत. रडवेला चेहरा पुन्हा प्रफुल्लित होई. जणू अमृतरस मिळे त्यांना.