आनंदमूर्तींनी मुकुंदरावांना घोडयावर बसावयास मदत केली. मुकुंदराव दोन्ही हातांनी घोडयावर धरून बसले. पाठीमागे आनंदमूर्ती बसले. त्यांनी एका हातानं लगाम धरला, एका हातानं मुकुंदरावांस धरून ठेवलं. पुढे दोन्ही हातांनी लगाम धरून ते हात मुकुंदरावांच्या वक्षःस्थळावर ठेवले.
''घाबरू नका. मी नीट धरून ठेवलं आहे; पडू देणार नाही.'' ते म्हणाले.
घोडा भरधाव जात होता. वरून जलधारा भरधाव येऊ लागल्या. दोघं भिजून ओलेचिंब झाले.
''रामदासला अटक झाली म्हणून आकाश रडत आहे बहुधा. माया घरी रडत असेल. शांता रडत असेल. रामदासचे आईबाप रडत असतील.'' आनंदमूर्ती म्हणाले.
''रडत नाहीत. देशासाठी पकडला गेला म्हणून साखर वाटतील.'' मुकुंदराव म्हणाले.
''सोमदत्त असाच वादळात सापडला होता.''
''परंतु तो बिचारा एकटा होता.''
''चारुदत्त व वसंतसेना अशीच पावसात सापडली होती. परंतु त्यांना त्यामुळे आनंदच उलट वाटला. जणू हृदयातले प्रेमाचे मेघ वर मोकळे होण्यासाठी उडून गेले व त्यांनी त्यांच्यावर भरपूर अभिषेक केला. दोघांना एकत्र प्रेमस्नान घातलं.''
''बोलू नका. घोडा दौडवा.'' मुकुंदराव म्हणाले.
''कळ कदाचित येईल म्हणून भीती वाटते?'' ते म्हणाले.
''आता कळ गेली; आता बळ आलं. पायीसुध्दा मी आता पळत जाईन.'' मुकुंदराव म्हणाले.
''पाऊस थांबत नाही. जोराने येत आहे.
''पावसाची जरुरच होती. धरणीमाय वाट बघतच होती. आता पिकं मस्त येतील.''
''परंतु पीक हाती पडेल तेव्हा खरं. मेहनत, मशागत करावी. तपश्चर्या करावी.
परंतु अतिवृष्टीनं जातं, अवर्षणानं जळतं, यातून वाचलं तर दुसरे लुटारू लुटून नेतात.'' आनंदमूर्ती म्हणाले.
दुरून घोडयाच्या टापांचा टापटाप आवाज ऐकू आला. आनंदमूर्ती येत आहेत की काय? त्यांनाही रामदासाच्या अटकेची वार्ता कळली असेल व भरधाव येत असतील. दुसर्या कोणाचा असणार घोडा अशा वादळात? मुकुंदराव बसले राहिले व आवाज ऐकू लागले. आवाज जवळजवळ येत होता. होय, आनंदमूर्तीच होते ते. तो पहा त्यांचा मंदील पाठीवर उडत आहे. जणू पहिले बाजीराव. जणू विश्वासराव.
पाण्याचे टपटप शिंतोडे येऊ लागले. आकाशातील सर्कस जोरात सुरू झाली. रानटी जनावरे खवळली बहुधा. मॅनेजरचा चाबूक कडाड कडाड वाजत होता. आकाशाच्या तंबूतील दिवे तर दिसतच नव्हते. सर्कस का अंधारात होती? का तंबूचे कापड फार जाड असल्यामुळे आतील दिवे दिसत नव्हते?
घोडस्वार एकदम थबकला. तो खाली उतरला. मुकुंदरावांना बघून आनंदला, चकित झाला.
''तुम्ही येथे कसे?'' आनंदमूर्तींनी विचारले.
''धनगावला जात आहे. रामदासला अटक झाल्याचं कळलं. गेलंच पाहिजे. पाऊस येईल या भीतीनं वेगानं जात होतो. त्यामुळे छातीत कळ आली. अलीकडे बरेच वर्षांत अशी कळ आली नव्हती. पडून राहिलो तो घोडयांचा टापांचा आवाज ऐकला. वाटलं की तुम्हीच असावेत. अंधारात प्रकाश आला, आधार आला, संकटात सहाय्य आलं. मी प्रथम रामपूरचा रस्ता घेतला होता. तिकडे गेलो असतो तर एकटाच वादळात सापडलो असतो. देवांनच हात धरून या रस्त्याला लावलं.'' मुकुंदराव म्हणाले.
''आता कशी आहे कळ? छाती चेपू का हलक्या हातानं? का जरा पडता? आंनदमूर्तींनी विचारले.
''आता बरं वाटतं.'' मुकुंदराव म्हणाले.
''घोडयावर बसता का? तुम्ही बसून जा. मी पायी येईन.''
''मला बसता येत नाही.''
''तुम्ही बसा, मी तुम्हाला धरून पायी चालेन.''
''मला धरून घोडयावरूनच नाही का तुम्हाला जाता येणार? लौकर जाऊ.''
''परंतु छातीत कळ पुन्हा आली तर?''
''आता येणार नाही असं वाटतं.''
''बसा तर मग घोडयावर. मी दौडवीत नेतो.''