''माया, रडू नको. वंगकन्येला रडणं शोभत नाही. स्वातंत्र्यप्रिय महाराष्ट्रालाही ते शोभत नाही. सार्या देशालाच ग्रहण लागलेलं आहे. जोपर्यंत पारतंत्र्य आहे तोपर्यंत कोठले सुखाचे संसार? तोपर्यंत सुखाचे संसार करू बघणं, सुखाच्या संसाराची इच्छा करणं म्हणजेही पाप. आपणाला हे शिकविण्यासाठी हे संकट आलं आहे. सेवा करताना सत्त्वपरीक्षा होत असते. तीत उत्तीर्ण झालं पाहिजे. माया, धीराने राहा. शांत राहा. चरखा आहेच, तुला धीर द्यायला. चरखा म्हणजे महात्माजी, चरखा म्हणजे पूज्य विनोबाजी, चरखा म्हणजे वृध्द प्रफुल्लचंद्र रॉय. हे सारं तुझ्याजवळ त्या चरख्याच्या रूपाने आधार देण्यास आहेत. दयाराम, तू आहेसच. मुकुंदराव, मोहन यांना कळलेच. शिवतरला जाऊन बाबांना व आईला तू धीर दे. माया, तू घरी सविस्तर पत्रं लिही. चिमाआप्पा वगैरे आहेतच येथे. या माय-बहिणी आहेत. उगी; रडू नको. चला फौजदारसाहेब.'' रामदास शांतपणे म्हणाला.
दयारामने येरवडाचक्र व सुंदर पेळू आणून दिले. मायेने घरातून कपडे आणून दिले. घोंगडी वगैरे सारे दिले.
''ही अंगावर असू दे हं.'' ती स्फुंदत म्हणाली.
''हो. ते संरक्षण आहे. ते सर्वस्व आहे.'' रामदास म्हणाला.
फौजदार, पोलिस रामदासला घेऊन गेले. दयाराम थोडया वेळाने आश्रमात गेला. माया शून्य दृष्टीने पाहत खिडकीशी उभी होती.
माया बाहेर आली. तिने दार उघडले. तो तेथे काही पोलीस व स्वतः फौजदार उभे. माया चकित झाली.
''कोण पाहिजे?'' तिने विचारले.
'दीनबंधू रामदास.'' फौजदार म्हणाले.
''काही काम आहे का? बरं नाही वाटत म्हणून पडले आहेत.'' ती म्हणाली.
''त्यांच्यावर वॉरंट आहे. त्यांना अटक करण्याचं कटु कर्तव्य मला करावयाचं आहे. दुर्दैवी माझे हात.'' तो म्हणाला.
पोलीस व फौजदार आलेली वार्ता गावात तात्काळ गेली, गावातील स्त्री-पुरुष, मुले सर्वांची तेथे गर्दी झाली. आश्रमातून दयाराम, पार्थ, चुडामण तेथे आले. रामदासही उठून बाहेर आला. फौजदार, पोलीस आत येऊन बसले. रामदासने वॉरंट पाहिले. राजद्रोह, खून करणे वगैरे कलमांखाली अटक होती.
''ही काय भानगड?'' रामदासने विचारले.
''आम्हाला तरी काय माहीत !'' फौजदार म्हणाला.
''शेतकर्यांचे रस्ते करणारा, त्यांच्या विहीरी बांधून देणारा, त्यांच्या जमिनी परत देणारा, त्यांच्यासाठी दवाखाने घालणारा, त्याला का अटक? तो अपराधी?'' गावातील म्हातारे चिमाआप्पा म्हणाले.
''सरकारला जमीनदार आवडतात, जमिनी देणारे आवडत नाहीत.''दयाराम म्हणाला.
''बरं चला, निघा.'' फौजदार म्हणाले.
''खरंच का नेणार यांना?'' माया रडत म्हणाली.
''आम्ही हुकमो बंदे.'' फौजदार म्हणाले.
''ही बंगाली बाधा आहे. बंगाली मुलीमुळे सरकारला संशय आला. ब्रिटिश सरकार आम्हाला सुखाचं लग्नही नाही का करू देणार? बंगालच्या पाठीमागं नेहमीच का हात धुऊन लागणार? माझा दुर्दैवी बंगाल.'' ती दुःखाने म्हणाली.
''भाग्यवान बंगाल.'' दयाराम म्हणाला.