मो-या गायीला ते ऐकून प्रेमाचे भरते आले. सजनची इतर कसायांनी चेष्टा केली. तो म्हणाला, “त्या गाईचे अधिक हाल होऊ नयेत म्हणून ती मी विकत घेतली. तिला मी घेतलं नसतं तर त्या शेतक-यानं तिचे हाल केले असते. अन्न-पाण्याशिवाय मारल असतं. माझ्याकडे की गाय किती आशेनं पाही. तिचे मी हाल नाही होऊ देणार. एका घावानचं मान दूर करीन तिची!”
मोरीला कृतज्ञता वाटू लागली. ती सजनचे हात चाटू लागली. सजनला आश्चर्य़ वाटले. मारणा-यावर प्रेम करणारी ती गाय! सजनच्या डोळ्यांत पाणी आले. सजन प्रेमाने तिच्या पाठीवरुन हात फिरवत होता. मित्र म्हणाले, “सजन, चल घरी.” सजन म्हणाला, “अजून मला काम आहे. अजून तो गोपाळ कसा आला नाही? मी घेतलेल्या गायीत एखादी चांगली गाय असली तर तो घेऊन जातो. मी तेवढ्याच पैशांत त्याला देतो. तो गायीची उपासना करतो. सेवा करतो. गायीच्या सेवेत आपलंही कल्याणच आहे. आपण भाकर खातो ती गायीच्या पुत्राच्या श्रमाचीच ना? गोपाळ फार थोर मनाच तरुण आहे. त्यानं गोसंवर्धन शाळा उघडली आहे; जणू गायींचा आश्रमच त्यानं काढला आहे. आज अजून का येत नाही! का त्याच्याजवळ पैसे नाहीत?” सजन असे म्हणत आहे तो गोपाळ दिसला.
सजनचे शब्द ऐकून मोरीच्या मनात विचार आले. ‘आपल्याला तो गोपाळ घेईल का? तो गोपाळकृष्ण तर नाही? स्वतः परमात्मा तर नाही? या सज्जन कसायाच्या हाती मी पडल्ये. दुस-या कसायांनी लगेच दंडे हाणीत नेले असते. घेईल का गोपाळ आपल्याला विकत? पण लगेच मनात येई, कशाला जगायची आशा? त्या देवाजवळ, त्याच्या अव्यंग धामी जा. पण का आशा धरु नये? मी मानवाची जास्त सेवा करीन. सेवेसाठी जगता आले तर त्यात किती आनंद आहे? यामुळं मर्त्यलोकाचा देवानाही हेवा वाटतो. ही कर्मभूमी. ही सेवाभूमी, मला संधी सापडली की, मी त्यांची सेवा करीन. म्हणावं, प्रेमदृष्टीनं बघा; दोन काड्या घाला; वेळेवर पाणी दाखवा; मी त्यांच्या बाळांना दूध देईन.’ असे विचार ती मनात खेळवीत होती.
तो पाहा गोपाळ आला, सजनने त्याला सलाम केला. त्याने उलट केला. “आज फार गाई आल्या नव्हत्या. पुढच्या बाजाराला येतील. आणि गोपाळदादा, चांगली गाय आज एकसुद्धा नव्हती. सा-या मरतुकड्या, मी तीन-चारच विकत घेतल्या.” सजन बोलत होता. मोरीचे हृदय खालीवर होत होते, ती गोपाळकडे बघे आणि पुन्हा खाली मान घाली. जगण्यासाठी याचना नको. मोरी सत्त्वनिष्ठा होती.
तिचे हे आळवणे चालू असता घरातले शब्द तिच्या कानांवर आले, ‘आज घेऊन जातो मोरीला. काय मिळतील १०-५ रुपये ते घेऊन येतो.’ शामराव बोलत होते. आठ वाजता तिला गोठ्यातून बाहेर काढण्यात आले. ती बेफाम झाली. हातातून निसटून गोठ्यात आली. तेथे बसली. उठेना. पाठीत काठ्या बसल्या. मुसक्या बांधून तिला ओढून नेण्यात आले. आपली आई, आजी. पणजी जेथे मेल्या तेथे मरावे अशी मोरीची इच्छा होती. ती पुरी झाली नाही. तिला चरण आठवला-‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेण भारत!’ देवाची इच्छा प्रमाण. सारे चराचर मंगलच आहे. खाटकाच्या हातात तूच आहेस. त्या सु-यातही तूच आहेस. देवा, ने-मला कोठेही ने, परंतु हृदयराउळात तुझी मूर्ती असू दे. खाली मान घालून मोरी चालली होती. इतर गायी-बैल तिच्याकडे पाहात होते. मोरीने एक हंबरडा फोडला. “माझं प्रवचन ध्यानात धरा, सत्त्वाला जागा.” असे तिने या बंधु-भगिनीस सांगितले. मोरी गेली हे पाहून गावातील तृणवनस्पती, दगडधोंडे, पशु-पक्षी सर्वांना वाईट वाटले. परंतु तिचे शब्द, तिची शान्तगंभीर वाणी अद्याप सृष्टीच्या कानांत घुमत होती.
मोरी शांत दिसत होती. अश्रू तोंडावर सुकले होते. डोळे शांत, स्निग्ध झाले होते. तिने आपल्या धन्याला आणि मुलाबाळांना आशीर्वाद दिला.
आज गुरांचा बाजार. तेथील मुख्य गि-हाईक कसाबच. हिंदुस्थानातील दारिद्र्य, निष्ठुरता सारे तेथे दिसत होते. एका गोष्टीवरुन सा-या संसाराचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. हिंदुस्थानातील झाड पाहा, फळे पाहा, पशु-पक्षी पाहा, गायीबक-या पाहा, मुले पाहा, स्त्रिया पाहा, -कुठेही नजर फिरवा- हिंदुस्थानाचे दारिद्र्य, दुर्दैव तुम्हांला दिसून येईल. सर्वत्र मृतकळा.
खाली माना घालू गोमाता उभ्या होत्या, अपार मूक शोकसागर तेथे उसळला होता. सौदे होऊ लागले. शामरानवांच्या मो-या गायीकडे कोणी येईना. ती अत्यंत रोड होती. खाटीक पाहात व हसत जात. “अरे पाच रुपये –घ्या, घ्या.” शामराव म्हणत. शेवटी एका कसाबाला करुणा आली. आपल्या धन्याला आपल्यासाठी इतके तोंड वेंगडावे लागावे याचेच मोरीला वाईट वाटू लागले. ती देवाला मनात आळवीत होती. ‘देव, घेऊ दे रे मला कोणी तरी विकत. माझ्या चामड्याचे नाही का होणार एक-दोन जोडे, हाडांचे नाही का होणार चार-आठ आण्यांचे खत, मासाचे नाही का होणार काही पैसे? देवा, धन्याला का रे लाजवतोस?’ मोरीची ती प्रार्थना भगवानाने ऐकली. त्या सजन कसायाने तिला विकत घेतले. त्या कसायाचे नाव सजन होते. थोर पुरुषाचे नाव आपणास लाभावे यातही पूर्व-पुण्याई असते. त्या नावापुढे एखाद्या वेळी सद्बुद्धी होते. जीवनात क्रांती होते.