दूध काढल्यावर मोरीला सोडायचे. पण महाराने वासरु नेल्यावर सोडायचे ठरले. महार आला व त्याने फरफटत वासरु नेले. मोरीला सोडण्यात आले. अंगणात बाळ असेल, तो पाहीन... असे तिच्या मनात होते. ती धावत अंगणात आली. पण ते तिथे नव्हते. वासरु ठेवण्याची जागा ओळखली. आपल्या वासराच्या अंगाचा वास तिने ओळखला. ती जागा तिने चाटली, तेथे अश्रूंची धार सोडली. स्तनधार सोडली, रस्त्यात बाळाचा वास तिला येत होता. परंतु पुढे येईना. लोकांच्या जाण्यायेण्याने वास निघून गेला. बाळाला पाडण्यासाठी ती रानात भटकली. हंबरली, पण काही नाही. त्या टेकड्या तिला उत्तर देत. जणू ते पहाड, ते पाषाण तिच्या दुःखाची, तिच्या मातृहृदयाची टवाळी करत होते.
दिवसभर तिने काही खाल्ले नाही. परंतु इतक्यात तिच्या मनात विचार आला. रात्री धन्याला दूध नको का शिंपीभर द्यायला ? काही खाल्ले नाही तर दूध कसे येणार अंगावर ? काठ्या बसल्या तरी काठ्या खाऊन दूध निर्माण होत नाही. माझे सत्त्व जाऊल, औषधाला दूध दिलेच पाहिजे. धनी मारो किंवा कुरवाळो. इच्छा नसुनही ती काडी कुरतडू लागली. पोटचा गोळा गेला, त्याचे दुःख दूर सारुन ती काडी खाऊ लागली. सत्त्वशील थोर मोरी ! ज्या भारतवर्षात पशुपक्षीही सत्त्वशील व सत्यनिष्ठ झाले; हरणे, गाई. सत्यपूजक झाली; त्या भारतातील नरनारी पापात, स्वार्थात, लोभात, दंभात असल्याने मिंधेपणात लडबडलेली असावीत काय ? भारतमाते, आज तुझी अब्रू, तुझ्या नद्या, तुझ्या वृक्षवेली, तुझी गायगुरे, तुझी पाखरे थोडीफार राखत असतील तर असतील; तुझे मानवपुत्र तर अगदीच बहकलेले दिसतात.
मोरीपुढे रात्री चारा टाकण्यात येत नसे. “दिवसभर चांगली रानात चरुन येते; तिला कशाला चारा घातलास वामन ?” शामराव घसरा घालायचे. म्हशीपुढे चारा घालण्यात येई. मोरीचे तोंड पुरणार नाही तिथपर्य़ंत ती म्हैस म्हणायची, “घे हो बाई, माझ्यातला थोडा खा. तू शेजारी अगदी उपाशी. मला खाताना वाईट वाटतं.” परंतु मोरी खात नसे. जे अन्न आपल्यासाठी वाढलेले नाही ते ती कशी खाईल ? वाटेल त्याचे गिळंकृत करणारी, स्वाहा करणारी, -माणूस थोडीच ती होती ! ती पडली चार पायांची. दोन पायांच्या सर्वभक्षक नरदेवाची सर तिला कोठून येणार ?
रानात उन्हाळा असल्याने तिला पाणीही मिळत नसे. कोठे चिखलातले चोखून घेता आले तर तेवढेच घ्यावे. रानात चाराकाडीही नव्हती. अन्नाशिवाय तिची उपासमार होतच होती. आता पाण्याविना कंठशोष पडू लागला. दूध तिच्या स्तनातून आता थेंबभरही येत नसे. ‘माझ्या रक्ताच्या बिंदूबिंदूचे दूध करुन स्तनातून दे रे पाठवून.’ अशी गोपाळकृष्णाला मोरी प्रार्थना करी, परंतु गोपाळकृष्णाने ती ऐकली नाही, शामरावही आता मोरीखाली बसतनासे झाले.
मोरीचे जीवन गेले. तिचे जणू पंचप्राण गेले. तिचे दूध शोकाग्नीने आटले. शामरावांनी थोडा चारा मोरीसमोर आज टाकला. कारण आज वासरु नाही, तेव्हा गाय लाथ मारील. ते दूध काढायला बसले. ज्या मातेचे वत्स मेले आहे, एका क्षणापू्र्वी मेले आहे. तिच्या डोळ्यांसमोरुन ओढले आहे, तिचे दूध काढायला ते बसले. गाईचे हृदय त्यांना कसे कळावे? तिला भावना होत्या. तिला दुःखामुळे पान्हा फुटेना. शामराव आचळ जोरजोराने ओढू लागले. मोरीला वेदना होऊ लागल्या. कधी वर न केलेला पाय तिने जरा वर केला. पण पुन्हा खाली घेतला. आपल्या धन्याला लाथ लागेल. याच्या आईने व बापाने माझ्या आईची पूजा केली. त्यांचा हा मुलगा. त्याला पाय कसा लावू, असे वाटून मोरीने पाय खाली घेतला होता. शामरावांनी एक काठी पाठीत मारली. जी तिची पाठ आईकडून चाटली असे. तिच्यावर आता काठ्या बसत होत्या. परंतु अशाही प्रसंगी बसावी ! मोरी शोकाने वेडी झाली. तिने लाथ मारली. शामरावांना लागली. सपासप दोन-तीन काठ्या बसल्या. शामरावांचा मुलगा वामन तेवढ्यात बाहेर आला. “बाबा, तिचं वासरु मेलं. म्हणून नसेल हो ती दूध देत. राहू दे आजचा दिवस. मारु नका.” वामन आवर्जून म्हणाला.
“अरे, मग मात्रा कशात घेऊ ? गायीच्या दुधात मात्रा घ्यायची आहे ना ? औषधाला नको थोडं तरी दूध ? आणि वासरु असलं तरी किती देते म्हणा !” शामराव रागाने बोलत होते.
मोरीने ते शब्द ऐकले, ती आपले दुःख विसरली, ती सत्त्वशील गाय होती. धन्यासाठी आपली आई रात्री अपरात्री दूध घ्यायची हे तिला आठवले. हा धनी कसाही असला तरी त्याच्या पूर्वजांची पुण्याई थोर आहे. माझी आई व आजी वरुन मला शिव्याशाप देत असतील. मी सत्त्व गमावले म्हणत असतील. तांबूआई, बघ मी दुःख गिळते. माझी दुग्धधारा असेल तेवढी देते शामरावांच्या भांड्यात धार वाजली, “बघ पान्हाळली ! अरे, सोटे-पान्हवण पाहीजे तिला. हेच तिचं आंबोण. या लबाड असतात रे उनाड गाई. आता वासरु नाही. तिला वाटलं, आज पाय उचलला की उद्यापासून कटकट बंद. पण माझ्याशी आहे म्हणावं गाठ. उद्यापासून दोन काठ्या लगवायच्या व मग बसायचं कासेखाली.” शामराव म्हणाले.
मोरी ऐकत होती. आपण थोडा सत्त्वभंग केला. त्याचे हे प्रायश्चित्त. ही शिक्षा भोगलीच पाहिजे असे तिने मनात ठरवले.